एक काम करा घरातून बाहेर पडणे टाळा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0
749

 

मुंबई, दि.२४ (पीसीबी) – गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या जनतेला संबोधित केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यापर्यंत जात असलेल्या तक्रारींचाही उल्लेख केला. संचारबंदीच्या काळात त्रास होत असल्याच्या तक्रारींना उत्तर देताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी उत्तर दिले.

महाराष्ट्रातील जनतेशी बोलताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, ‘करोनाचा प्रार्दूभाव थांबवण्यासाठी राज्य सरकारकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. संकट गंभीर आहे. मात्र, घाबरून जाऊ नका. कारण सरकार खंबीर आहे. हे दिवस फार महत्त्वाचे आहेत. काही जणांकडून माझ्याकडं तक्रारी येत आहेत. पोलिसांकडून त्रास देत असल्याचं काहीजण म्हणत आहे. पण, पोलीस विनाकारण कुणालाही त्रास देणार नाही. जर कुणी त्रास देत असेल, तर १०० क्रमांकावर फोन करून सांगा. तुम्हाला जिथं जायचे आहे. तिथंपर्यंत तुम्हाला त्रास होणार नाही,’ ‘अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्यांना पोलीस कोणताही त्रास देणार नाहीत. त्यांनी वा या सेवा पुरवणाऱ्यांनी त्यांच्या वाहनावर कंपनीचे नाव लिहिणे आवश्यक आहे. त्याचबरोबर त्या कर्मचाऱ्याकडं त्याचं ओळखपत्र असणे आवश्यक आहे. सामान्य नागरिकांनी बाहेर पडणे टाळावे. गेल्या काही दिवसांपासून अनेक जण मला विचारत आहेत की, आम्ही काय करू. मी महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला एकच काम सांगेन की तुम्ही फक्त घरात थांबा. बाकी काही करू नका. सरकारला करोनाचा प्रार्दूभाव दुसरीकडं जाऊ द्यायचा नाही. जिथे करोनाचा संसर्ग झाला आहे. तो तिथेच थांबवायचा आहे. त्यामुळे आतापर्यंत सहकार्य करत आला आहात. त्यात एक पाऊल पुढे टाका. घरातून बाहेर पडणं टाळा. कारण आजच्या परिस्थिती घराशिवाय सुरक्षित दुसरी कोणतीच जागा नाही,’ असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.