नवी दिल्ली, दि. २० (पीसीबी) – तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रविवारी जाहीर झालेल्या एक्झिट पोलवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. एक्झिट पोलच्या आकडेवारीवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन ममता बॅनर्जी यांनी विरोधी पक्षांना केले आहे. दरम्यान, या रणनितीचा उपयोग ईव्हिएम मशीनमध्ये फेरफार करण्यासाठी केला जातो, असा आरोपही त्यांनी केला आहे.
रविवारी लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील मतदानानंतर एक्झिट पोल जाहीर करण्यात आले. यामध्ये एनडीए बहुमताकडे जात असल्याचे दिसून आले होते. एक्झिट पोलच्या जाहीर झालेल्या आकडेवारीनंतर ममता बॅनर्जी यांनी ट्विट करून यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मी एक्झिट पोलवर विश्वास ठेवत नाही. ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार करण्यासाठी ही रणनिती वापरली जाते. मी सर्व विरोधी पक्षांना एकत्र, खंबीर आणि साहसी राहण्याचे आवाहन करत आहे, अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले.