Maharashtra

एकतर्फी प्रेमातून विवाहितेचा कटरने गळा चिरुन खून

By PCB Author

December 07, 2018

औरंगाबाद, दि. ७ (पीसीबी) – एकतर्फी प्रेम स्वीकारण्याचा हट्ट करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराने पतीपासून विभक्त राहणाऱ्या महिलेचा कटरने गळा चिरून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना गुरुवारी (दि.६) सायंकाळी पाचच्या सुमारास औरंगाबाद येथील एन-१२ डी सेक्टर येथे घडली.

सुनंदा शिवाजी ऊर्फ प्रमोद वाघमारे (वय २५) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार, शुभम भाऊसाहेब बागूल (२५, रा. सिद्धार्थनगर) याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनंदाचा पती दारू पिऊन छळ करत असल्याने ती आईसोबत जाधवमंडी येथे राहत होती. नंतर तिने एकटे राहण्याचा निर्णय घेतला. चार वर्षांचा मुलगा व सहा वर्षांच्या मुलीसह सिद्धार्थनगरातील कचरू गाडेकर यांच्या तीनमजली घरात पाच बाय पाचच्या खोलीत भाड्याने राहण्यासाठी आली होती. ती धुणीभांडी व पोळ्या करत होती. शुभमचे नातेवाईक याच चौकात राहत असल्याने तो नेहमीच चौकातील मंदिरात येऊन बसायचा. शुभम व सुनंदाची पूर्वीपासून ओळख होती. मात्र एकतर्फी प्रेमातून तो तिला त्रास देऊ लागला. दोन दिवसांपूर्वी शुभम तिच्या घरी गेला होता. त्याने सुनंदासोबत वाद घालून शेजाऱ्यांसोबतही भांडण केले. गुरुवारी सुनंदाची मुले घरात नसताना शुभम तिच्या खोलीत आला. अचानक त्यांच्यात भांडण सुरू झाले. रागाच्या भरात शुभमने सुनंदाचा कटरने गळा चिरला. आवाजामुळे शेजारी राहणाऱ्या एका तरुणीने खिडकीतून हा प्रकार पाहिल्यानंतर तिने सिडको पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन सुनंदाला घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. तर आरोपी  शुभम याला अटक केली आहे. सिडको पोलीस तपास करत आहेत.