उसाच्या शेताला लागलेली आग नियंत्रणात आणण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू

0
646

कोल्हापूर, दि. १२ (पीसीबी) – उसाच्या शेताला लागलेली आग नियंत्रणात आणताना एका शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना कोल्हापूर जिल्ह्यातील लाटवडे गावात घडली.

शिवाजी विष्णू कोळी (वय ५०, रा. लाटवडे) असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेची वडगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत शिवाजी कोळी यांची हातकणंगले तालुक्यातील लाटवडे येथे शेती आहे. त्यांच्या शेतातील उसाची पाचट पेटविण्यासाठी ते गेले होते. पाचट पेटवत असताना अचानक शेजारीच असलेल्या उसाच्या फडामध्ये याची ठिणगी पडली. वाऱ्याचा वेग जास्त असल्याने काही क्षणातच शेजारच्या उसाच्या फडाने मोठा पेट घेतला.  दुसऱ्याची शेती असल्याने त्यांनी धाडसाने ही आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. पण बघता बघता आगीने मोठे रूप धारण केले. चारही बाजूंनी लागलेल्या या आगीत ते अडकले. त्यातून त्यांना बाहेर पडता आले नाही. त्यामुळे ते यात पूर्णपणे भाजले गेल्याने त्यांचा जागीच होरपळून मृत्यू झाला.