पुणे, दि. २२ (पीसीबी) – ‘उनाड वारा साहित्य’ परिवारातर्फे घेण्यात आलेले पहिले राज्यस्तरीय काव्य स्नेहसंमेलन पुण्यातील डॉ. आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे नुकतेच पार पडले. या संमेलनात राज्यभरातील सर्व जिल्ह्यातील कवी, कावयित्रींनी उत्फूर्त सहभाग नोंदवला.
काव्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी कवयित्री आरती देहगावकर, कवयित्री ज्योती देसाई होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून कवी ललित कोलते व कवी कृष्णा बुरुंगले होते.
कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात ६० हून अधिक कवींनी आपल्या रचना सादर केल्या. दुसऱ्या सत्राच्या सुरवातीला कवयित्री कुमुदिनी मधाळे (राजनाई) यांच्या ‘कुमुदिनी’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
समूहातील एक गुणी कवी व गझलकार यांच्यावरील प्रतिकूल परिस्थितीला हातभार लावण्यासाठी संमेलन समूह कमिटीने व कवयित्री क्षितिजा पिंपळे यांच्या काव्यसंग्रह विक्रीतून जमा झालेला मदत निधी कवयित्री त्रिशीला तायडे यांच्याकडे सुपूर्द केला.
‘उनाड वारा’ या व्हॉट्स अॅप समूहाने साहित्यकारांना एक व्यासपीठ उभे केले आहे. या समूहावर २५० हून अधिक साहित्यिक साहित्य सेवा करतात.
समूहाचे ऍडमीन कवी अविनाश शिंदे व कवयित्री प्राची मेडपीलवार, कवी शरद कवठेकर, कवयित्री कुमुदिनी मधाळे, कवी प्रवीण बनसोडे, कवयित्री त्रिशीला तायडे, कवयित्री भरती तितिमारे, कवयित्री स्मिता देशमुख, कवी संजय खोत, कवी रज्जाक शेख, कवी बाळासाहेब हवापाटील आदींनी संमेलनाचे आयोजन केले.