उध्दव ठाकरे यांना अपयशी करण्यासाठी डाव

0
262

पुणे, दि. १ (पीसीबी) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अपयशी करण्यासाठी महाविकास आघाडीचे सहयोगी पक्ष प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. यातून त्यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्व आलबेल नसल्याचं सुचित केलं आहे. महाविकास आघाडी सरकार शरद पवार यांच्यामुळेच स्थापन झालं, मात्र आता या सरकारमध्ये त्यांचं ऐकलं जात नाही, असाही दावा चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केला.

चंद्रकांत पाटील म्हणाले, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अपयशी करण्यासाठी महाविकास आघाडीचे सहयोगी पक्ष प्रयन्त करत आहेत. महाविकास आघाडी सरकार शरद पवार यांच्यामुळेच स्थापन झालं. त्यांनी सरकारचे कान पकडून सांगायला पाहिजे, मात्र आता या सरकारमध्ये त्यांचं ऐकलं जात नाही.”

“कोरोना संदर्भात तर सरकारमध्ये गोंधळाचे वातावरण”
चंद्रकांत पाटील यांनी सरकारच्या कोरोना नियंत्रणासाठीच्या धोरणावरही सडकून टीका केली. “कोरोनासारख्या भयंकर साथीच्या आजाराच्या वेळी राज्य चालवणाऱ्यांची एक समान धारणा लागते. ती समान धारणा त्यांनी खाली नीट झिरपवावी लागते. मात्र आज राज्यात कोरोनाविषयी सर्व गोंधळच सुरु आहे. पुण्यात अर्ध्या तासात अहवाल येणारी कोरोना चाचणी आली. मग ती संपूर्ण राज्यात का नाही आली? कोरोना पॉझिटीव्ह सापडल्यावर लक्षणं नसलेल्याला घरी ठेवायचं की रुग्णालयात हेही निश्चित नाही. लक्षणं नसलेल्या व्यक्तीला घरी ठेऊन उपचार केले तर लक्षणं असलेल्या रुग्णाला जागा मिळेल. मात्र, त्यासाठी राज्यकर्त्यांमध्ये समान धारणा असावी लागते,” असं मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं.

ते म्हणाले, “कोल्हापूरमध्ये तुम्ही पुण्यातून गेला तरी 14 दिवस क्वारंटाईन केलं जातं. तर पुण्यात कोरोना संसर्ग असेल आणि लक्षणं नसतील तर घरी क्वारंटाईन केलं जातं. दुसरीकडे कोल्हापूरमध्ये काहीच झालेलं नाही अशा व्यक्तीला फारतर चाचणी घेण्याऐवजी थेट संस्थात्मक विलगीकरण करता. यात काहीतरी समान धोरण असायला हवं.”

“आधी कोरोनासोबत जगायला हवं म्हणतात, नंतर संचारबंदी लागू करतात”

चंद्रकांत पाटील म्हणाले, “सरकार मध्येच म्हणतं की रिक्षात दोन जणांनी प्रवास केलेला चालेल आणि अचानक 10 दिवसांचा कडक लॉकडाऊन लागू केला जातो. मुंबईत सलग दोन किलोमीटरच्या बाहेर गेल्यावर अटक करण्याचा नियम केला. सकाळी माणूस मॉर्निंग वॉकला गेला तरी 7-8 किलोमीटर जातो. काल या प्रकरणी सात साडेसात लोकांवर गुन्हे दाखल झाले. हे काय चाललं आहे. एकीकडे सरकार आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी काळजी घेत बाहेर पडायला हवं म्हणता. कोरोना सोबत जगायला हवं म्हणता. त्यानंतर संचारबंदी लागू केली जाते. हा गोंधळ सुरु आहे. हे अभिमानास्पद नाही.”

चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सरकारच्या पंढरपूर वारीच्या धोरणावरही टीका केली. सरकारने आधी पादुका हेलिकॉप्टरने नेणार असं सांगितलं, मात्र नंतर बसने पादुका नेतात. त्याचं भाडंही आकारलं जातं. सरकारचं नेमकं काय चाललंय? असा प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला.