मुंबई, दि. २४ (पीसीबी) – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सहकुटुंब आज (शनिवार) अयोध्येला रवाना झाले. त्यावेळी उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवर आलेले शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी गहिवरून आले. तर यावेळी जुन्या आठवणींना उजाळा देताना त्यांना अश्रू अनावर झाले. तर मताचे राजकारण बाजूला ठेवून हिंदुत्वाच्या बाजूने जे येतील, त्यांना सोबत घेऊ, असे विधान भाजपसोबतच्या युतीबाबत करताना मनोहर जोशी यांनी केले.
मी १९९२ मध्ये अयोध्या दौऱ्यावर निघालो होतो. त्यावेळी शिवसेना पक्ष प्रमुख बाळासाहेब ठाकरे मला निरोप देण्यासाठी सेनाभवनला आले होते. आमचे विमान अयोध्येला न थांबता कोलकात्याला गेले होते. मी पुन्हा अयोध्येला आलो, मात्र तोपर्यंत अयोध्येची तारीख उलटून गेली होती. त्यामुळे आम्हाला जाता आले नव्हते, अशी आठवण जोशी यांनी यावेळी करून दिली.
आमचे अपुरे राहिलेले कार्य आज उद्धव ठाकरे पूर्ण करायला गेले आहेत, त्यांना शुभेच्छा देणे माझे कर्तव्य आहे, म्हणून मी मातोश्रीवर आलो होतो, असे सांगताना जोशींना गहिवरुन आले. संपूर्ण ठाकरे कुटुंबीय ज्या कार्यासाठी बाहेर पडले आहेत, त्यात त्यांना यश मिळो, इतकीच आमची प्रभू रामचंद्रांकडे प्रार्थना आहे, असे सांगतानाही मनोहर जोशी यांचे डोळे ओले झाले.