उद्या ओबीसी आरक्षणासाठी राज्यभर आंदोलन; एक हजार ठिकाणी होणार निदर्शने; भाजपचा इशारा

0
194

नागपूर, दि.१४ (पीसीबी) : ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे सरकारवर घणाघाती हल्ला चढवला आहे. ओबीसी आरक्षण गेलं. यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भूमिका संशयास्पद असल्याचं सांगून ओबीसी आरक्षणासाठी उद्या राज्यात जोरदार आंदोलन करण्यात येईल. एक हजार ठिकाणी हे आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. तसेच ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होणार असल्याने त्यांनी संतापही व्यक्त केला.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. ओबीसींना आरक्षण मिळालं नाही यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भूमिका संशयास्पद आहे. ओबीसींना आरक्षण मिळू नये म्हणून सरकारमधील झारीतले शुक्राचार्य जबाबदार आहेत. काँग्रेस नेते नाना पटोले यांनीही विधी आणि न्याय विभागाने व्यवस्थित बाजू न मांडल्याने आरक्षण गेल्याचं सांगितलं. हा विभाग कुणाकडे आहे हे सर्वांना माहीत आहे, असं सांगतााच राज्य सरकार विरोधात उद्या भाजप राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे. राज्यभरात एक हजार ठिकाणी आंदोलन करणार असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं.किमान सहा जिल्ह्याचा डाटा तयार केला असता तर तिथे आरक्षण देता आलं असतं. सहा महिन्यात राज्य सरकारने काय केलं? हे सर्वोच्च न्यायालयाने विचारलं. पण राज्य सरकारने काहीही केलं नाही. ओबीसी आयोगाचा प्रस्ताव आल्यानंतर मुख्य सचिवाने एकही बैठक घेतली नाही. मुख्य सचिवांवर बैठक न घेण्याबाबत दबाव आहे, असा आरोपही त्यांनी केला.

नागपूर शहरात उद्या सहा ठिकाणी भाजपचं धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. सहा विधानसभा मतदार संघातही आंदोलने होतील. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आदी नेते या आंदोलनता सहभागी होतील, असं सांगतानाच जोपर्यंत ओबीसींना न्याय मिळत नाही. तोपर्यंत भाजप आंदोलन करतच राहणार, असा इशाराही त्यांनी दिला.

यावेळी त्यांनी राज्याचे मदत आमि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची अप्रत्यक्ष बाजू घेत सरकारवर टीका केली. विजय वडेट्टीवार यांना छोटं खातं देऊन या सरकारने त्यांची गोची केली आहे. ओबीसी मंत्री म्हणून त्यांच्यावर जबाबदारी ढकलण्याचा डाव आहे. मुख्यमंत्री काहीही करत नाही. काँग्रेसवर ढकलण्याचा प्रयत्न करत आहे, असा हल्लाही त्यांनी चढवला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला होता. त्यावरूनही बावनकुळे यांनी पटोले यांना घेरलं. नाना पटोले यांचे आरोप हास्यास्पद आहेत. त्याचं सरकार आहे, मग ॲडव्होकेट जनरल आमच्या मताने कसे चालणार?, असा सवाल त्यांनी केला.