उद्याच्या निवडणुकीत समजा शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र लढले तर …

0
575

मुंबई, दि. १७ (पीसीबी) : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला आगामी विधानसभा निवडणुका एकत्र लढवाव्या लागतील, असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी आजच्या ‘सामना’च्या अग्रलेखात लिहिलं आहे. त्यासाठी त्यांनी काँग्रेसचा हवाला दिला आहे. राज्यात भाजपला स्वबळावर लढावं लागेल कारण त्यांच्यासोबत दुसरं कुणी लढणार नाही. काँग्रेसलाही स्वबळावर लढण्याची खुमखुमी आली आहे. तसं झालं तर राहीले दोनच पक्ष. शिवसेना आणि राष्ट्रवादी. त्यांना मग एकत्र लढण्याशिवाय पर्याय नसल्याचं राऊतांचं अग्रलेखात म्हणणं आहे. विशेष म्हणजे अशी चर्चा पहिल्यांदाच होते आहे असं नाही तर याआधीही भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र येतील किंवा राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येतील अशा चर्चा झडलेल्या आहेत. त्याची गणितही मांडली गेली आहेत. पण उघड उघड सत्तेची समीकरणं मांडण्याचा प्रयत्न मोदी-उद्धव यांच्या भेटीपासून होतो आहे. त्यामुळेच ‘सामना’तल्या अग्रलेखाला महत्व आहे. त्याच पार्श्वभूमीवर काही शक्यता तपासून पाहुया.

शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र लढले तर –
अजित पवार दोनच दिवसांपुर्वी म्हणाले की, ज्यांच्याकडे 145 हा बहुमताचा आकडा असेल त्याची सत्ता असेल. आजच्या सामनाच्या अग्रलेखातही त्याचा उल्लेख केला गेला आहे. सत्तेसाठी आकडा हीच मुख्य अट आहे. महाराष्ट्र विधानमंडळ वेबसाईटवरच्या माहितीनुसार शिवसेनेचे 56 आमदार आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभेत 54 आमदार आहेत. 105 आमदारांसह भाजपा हा सर्वात मोठा पक्ष आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बेरीज केली तर ती 110 एवढी होते. म्हणजेच बहुमतासाठी त्यांना 35 आमदार कमी पडतात. ही आहे सध्याची स्थिती. 2024 ला एकत्र लढले तर बहुमतासाठी लागणारा 145 चा आकडा दोघांना गाठणं शक्य होईल? बहुमतासाठी दोघांपैकी एकाला शंभरी गाठावी लागेल किंवा दोघांनाही प्रत्येकी पाऊनशे जागा जिंकाव्या लागतील. हे शक्य होईल?

शिवसेना-राष्ट्रवादीचा आकडा काय सांगतो ? –
गेल्या तीन विधानसभा निवडणुकीतली राष्ट्रवादीची कामगिरी पाहुया-2009 ला 62 आमदार निवडून आले तर 2014 ला ही संख्या होती 41, तर 2019 ला 54. याचाच अर्थ असा की, राष्ट्रवादीनं आतापर्यंत एकदाही पंच्याहत्तरी पार केलेली नाही. आता शिवसेनेची कामगिरी बघुया, मागच्या तीन विधानसभेतली. शिवसेनेचा सर्वात मोठा आकडा होता 2014 चा 63 आमदार. त्यानंतर मात्र गेल्या निवडणुकीत त्यांचे
आमदार घटले आणि हा आकडा 56 वर आला. 2009 साली सेनेचे आमदार होते 44. ह्या आकड्यांचा अर्थच असा की, शिवसेनाही जेव्हा युतीत लढली आणि स्वतंत्र लढली तेव्हासुद्धा त्यांनाही पाऊनशेचा आकडा पार करता आलेला नाही. शिवसेना-राष्ट्रवादीला एकत्र बहुमताचा आकडा पार करायचा असेल तर दोघांपैकी एकाला भाजपच्या ताकदीचं व्हायला लागेल. विधानसभेसाठी उद्धव, शरद पवार किंवा अजित पवारांना ‘मोदींसारखा करिश्मा’ करावा लागेल तरच हे शक्य आहे. सध्यस्थितीत तरी हे अवास्तव चित्रं दिसतं आहे.

3. काँग्रेस स्वबळावर लढली तर –
नाना पटोलेंनी अलिकडेच स्वबळाचा नारा दिला आहे. अधूनमधून इतर काँग्रेस नेत्यांनाही त्याची हुक्की येते. तेही व्यासपीठावरुन स्वबळाच्या घोषणा देतात. प्रत्यक्ष काम आलं की मात्र ते कुठे सहसा दिसत नाहीत. नानांनी फक्त स्वबळाचीच घोषणा केलीय असं नाही तर त्यांनी मुख्यमंत्री व्हायची इच्छाही प्रकट केली आहे. पण राऊत म्हणाले तसं नानांना बहुमताचा 145 आकडा गाठता येईल? गेल्या तीन विधानसभांपैकी काँग्रेसची सर्वोत्तम कामगिरी राहिली ती 2009 साली 82 आमदार. त्यानंतर ते चाळीशीतच अडकले. 2014 काँग्रेस 42 जागा जिंकू शकले तर गेल्या निवडणुकीत 44. याचाच अर्थ असा की 2024 ला नाना पटोलेंना मुख्ममंत्री व्हायचं असेल किंवा काँग्रेसला स्वबळावर सत्ता आणायची असेल तर कमीत कमी आताच्या जागांमध्ये आणखी शंभर आमदारांची बेरीज करावी लागेल. स्वबळाच्या घोषणा देण्याइतकं हे सोप्पं आहे का? राजकारणात अशक्य असं काहीच नसतं पण जेव्हा देशात काँग्रेस सर्वाधिक दुबळ्या अवस्थेत आहे, त्यावेळेस काँग्रेसनं महाराष्ट्रात स्वबळावर बहुमताचा आकडा गाठला तर तो चमत्कारच असेल.

भाजपा स्वतंत्र लढला तर –
भाजपाला आगामी विधानसभा स्वबळावरच लढावी लागेल असं दिसतं आहे. शिवसेना किंवा राष्ट्रवादी त्यांच्यासोबत गेली नाही तर त्यांना एकटं लढण्याशिवाय पर्याय नाही. पण ह्या दोन्ही पैकी एक त्यांच्यासोबत जाणारच नाही असं ठामपणे सांगता येत नाही. पण भाजपच्या स्वतंत्र लढण्याचीच शक्यता गृहीत धरलं तर काय होईल? गेल्या तीन विधानसभांमध्ये भाजपची सर्वोत्तम कामगिरी होती, 2014 ला. 122 आमदार. त्याच्या आधी म्हणजे 2009 ला फक्त 46 आमदार. आता 105 आमदार. याचाच अर्थ असा की, सेना, राष्ट्रवादी, काँग्रेस यापैकी फक्त भाजपाच असा आहे, ज्यानं 46 आमदारांवरुन थेट 122 आमदारांवर मजल मारली. म्हणजे पाऊनशे नवे आमदार निवडून आणले. हे त्यावेळेस शक्य झालं जेव्हा भाजपा स्वतंत्र लढले आणि मोदींचा करिश्मा भरात होता. कदाचित याच कामगिरीमुळे 2019लाही भाजपचं दिल्ली हायकमांड राज्यातल्या नेत्यांना स्वतंत्र लढा म्हणते होते. पण फडणवीसांच्या आग्रहामुळे सेनेला सोबत घेऊन लढले. परिणाम भाजपा 122 वरुन 105 वर आली. एवढच नाही तर निवडणुकीनंतर शिवसेना थेट पवारांसोबत गेली. पण हा झाला इतिहास. 2024 ला स्वतंत्र लढावं लागलं भाजपला तर बहुमताचा आकडा गाठता येईल? अशक्य नक्कीच नाही. कारण भूतकाळात त्यांनी अशी हनुमान उडी घेतल्याचं दिसतं आहे. फक्त यात दोन गोष्टी विसरुन चालणार नाही. 2014 ला हनुमान उडी घेतली त्यावेळेस त्यांच्या पाठिशी ओबीसी एकजूटपणे उभे होते. मोदींचाही करिश्मा होता. आता मात्र चित्रं पूर्णपणे बदललं आहे. त्यामुळे भूतकाळाचं गणित जरी भाजपच्या बाजूनं असलं तरी भविष्यकाळ वाटतो तेवढा सोप्पा नाही.

एकमेकांशिवाय पर्याय नाही –
सध्याची स्थिती पाहिली तर शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांना एकमेकांसोबत लढण्याशिवाय पर्याय नाही. भाजप ज्यापद्धतीनं शिवसेनेच्या अंगावर जातेय ते पहाता हे दोन्ही पक्ष एकत्र येतील असही वाटत नाही. त्यात काही कारणानं नेते एकत्र आले तर ऐन वेळेस कार्यकर्ते एकत्र येतील असं नाही. आले तर एकमेकांचे उमेदवार पाडण्यातच धन्यता मानतील. काँग्रेसनं कितीही स्वबळाचा नारा दिला तरी विलासरावांसारखं राज्याला मान्य होईल असं त्यांच्याकडे नेतृत्व नाही हे मान्यच करावं लागेल. शरद पवार हे गणितात पक्के आहेत. त्यांचं गणित सहसा चुकत नाही, ते चुकू देत नाहीत. त्यामुळेच ते असे एकमेव आहेत जे काँग्रेस-शिवसेनेला एकत्र ठेवू शकतात. भाजप आणि राष्ट्रवादी आगामी काळात एकत्र आले तर मग मात्र महाराष्ट्राचं राजकारण मजेशीर होईल. पण आकड्यांच्या ताकदीचा विश्वास सध्या तरी कुणाकडेच दिसत नाही. त्यामुळेच चार दोन जागा इकडे तिकडे सोडल्या तर स्थिती जैसे थे राहिली तर आश्चर्य वाटायला नको.