उद्धव ठाकरे, आधी बाळासाहेबांचे स्मारक बांधा, मग राम मंदिर – नारायण राणे

0
901

मुंबई, दि. १९ (पीसीबी) – उद्धव ठाकरे राम मंदिर बांधण्याच्या गोष्टी करत आहेत आधी त्यांनी मुंबईत बाळासाहेब ठाकरेंचे स्मारक बांधून दाखवावे, असे नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघात केला आहे. तसेच निवडणुका जवळ आल्या असल्यानेच शिवसेनेला राम मंदिराची आठवण आल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

येत्या २५ नोव्हेंबरपासून अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार असल्याची घोषणा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी केली. राम मंदिर बांधणार की नाही हे आधी भाजपाने सांगावे आणि त्यांना शक्य नसेल तर ते आम्ही बांधू असेही त्यांनी म्हटले होते. यावरही नारायण राणेंनी टीका केली आहे. शिवसेनेला मुंबईतल्या समस्या सोडवता आल्या नाहीत. शिवसेनेचे मंत्री केंद्रात आणि राज्यात सत्तेत आहेत मग इतके दिवस राम मंदिराचा प्रश्न का उपस्थित केला नाही, असाही प्रश्न नारायण राणेंनी विचारला आहे. तसेच एवढाच स्वाभिमान होता तर राजीनामा देऊन शिवसेनेचे मंत्री बाहेर का पडले नाहीत? असेही राणेंनी विचारले आहे.

सरसंघचालक मोहन भागवत यांनीही उद्गार चिन्हांमध्ये न बोलता थेट सरकारला मंदिर बांधण्याचा आदेश दिला पाहिजे. हे करा, ते केले पाहिजे, असे झाले पाहिजे असे बोलून काय फायदा असा सवालही त्यांनी केला. दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी केलेले भाषण म्हणजे किर्तनकार आले आणि किर्तन करून गेले या ढंगाचे होते असे म्हणत या भाषणाचीही राणेंनी खिल्ली उडवली आहे.