“उत्तर महाराष्ट्रात भाजपचा एकही आमदार दिसणार नाही” – आमदार अनिल पाटील

0
292

मुंबई, दि. २३ (पीसीबी) : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आज राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे खडसेंच्या येण्यामुळे राष्ट्रवादीमध्ये मोठा जल्लोष पाहायला मिळत आहेत. ‘एकनाथ खडसे राष्ट्रवादीत आल्याने आम्हाला बळ मिळेल. आम्ही भाजपमधून येणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक देवू’ अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी अमळनेरचे आमदार अनिल पाटील यांनी दिली आहे.

यावेळी बोलताना त्यांनी भाजपवर घणाघाती टीका करत ‘येत्या काळात उत्तर महाराष्ट्रात एकाही ठिकाणी भाजपा आमदार, खासदार दिसणार नाही’ असं विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. ते पुढे म्हणाले की, ‘मी वीस वर्ष भाजपामध्ये घालवले. ते दिवस वाया गेले. पण आता खडसेंच्या पक्ष प्रवेशानंतर रक्षा खडसेदेखील येत्या काळात विचार करतील’ असं अनिल पाटील म्हणाले आहेत.

खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे भाजपच्या गडाला सुरूंग
जळगाव जिल्हा आणि एकनाथ खडसे हे समीकरणच आहे. सत्ता कुणाचीही असो, जिल्ह्यात गेल्या किमान 25 वर्षापासून खडसेंचे वर्चस्व आहे. एकनाथ खडसे हे 6 वेळा भाजपकडून आमदार म्हणून निवडून आले आहेत. आता त्यांच्या पक्षांतरामुळे भाजपला मोठी झळ बसेल आणि राष्ट्रवादीला मात्र बळ मिळणार आहे. इतकंच नाही तर खडसेंनी जिल्हा परिषदेवर काँग्रेसचा खालसा करून गेल्या 30 वर्षांपासून त्या ठिकाणी भाजपचा झेंडा फडकावला आहे.
याशिवाय जिल्ह्यातील फैजपूर, भुसावळ, यावल, मुक्ताईनगर आणि वरणगाव नगरपालिका व नगर परिषदवर भाजपचा झेंडा फडकवला आहे. दूध फेडरेशनचे अध्यक्ष पद हे खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसे तर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी खडसेंची मुलगी रोहिणी खडसे आहे. त्यामुळे या ठिकाणी राष्ट्रवादीची पकड घट्ट होऊ शकते.

जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीला फक्त एक जागा कमी आहे. त्यामुळे येत्या काळात अविश्वास प्रस्ताव आणून जिल्हा परिषदेतही सत्ता बदल होऊ शकतो. जिल्ह्यात 32 टक्के लेवा पाटील समाज असून समाजाचं मोठे पाठबळ राष्ट्रवादीला मिळेल, अशी चर्चा आहे.