उत्तर प्रदेशमध्ये महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना

0
628

लखनऊ, दि. १४ (पीसीबी) – उत्तर प्रदेशातील जालोनमधून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. जालोन येथे गांधी इंटर कॉलेजमध्ये महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची काही समाजकंटकांनी विटंबना केल्याचा प्रकार घटला. यापूर्वीही दिल्लीमध्ये असा प्रकार घडला होता.

दरम्यान, उत्तर प्रदेशातील या घटनेनंतर निरनिराळ्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात आले. तसेच महात्मा गांधी यांचा पुतळा पुन्हा बसवण्यात यावा आणि समाजकंटकांना अटक करण्यात यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. गाधी इंटर कॉलेजचे प्राचार्य रवी कुमार अग्रवाल यांनी याप्रकरणाची पोलिसांत तक्रार दाखल केली. आपण जेव्हा महाविद्यालयात पोहोचलो तेव्हा महात्मा गांधींच्या पुतळ्याचे शीर हे जमिनीवर पडल्याचे आढळले. यानंतर त्वरित याची माहिती महाविद्यालय प्रशानाला दिल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

यानंतर अग्रवाल यांच्या तक्रारीवरून अज्ञात समाजकंटकांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून महात्मा गांधींचा पुतळाही नीट करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक सतीश कुमार यांनी दिली. यानंतर सर्वच स्तरातून या घटनेचा निषेध करण्यात येत आहे.