उंदीर, घुशी आणि खेकड्यांनी मुठा कालवा पोखरला-गिरीश महाजन

0
707

मुंबई, दि. २८ (पीसीबी) – राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी खडकवासला धरणातून पाणीपुरवठा करणाऱ्या मुठा कालव्याला पडलेल्या भगदाडाचं खापर उंदीर, घुशी आणि खेकड्यांवर फोडलं आहे. उंदीर, घुशी आणि खेकड्यांनी हा कालवा पोखरल्यानेच तो फुटल्याचं तर्कट महाजन यांनी मांडले आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

गुरूवारी मुठा कालवा फटल्याने दांडेकर पूल आणि परिसरात पाणी साचल्याने हाहाकार उडाला होता. त्यामुळे या  परिसरातील अनेक घरात पाणी शिरल्याने अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले होते. त्यामुळे महाजन यांनी आज या कालव्याची पाहणी केली, तसेच स्थानिकांची विचारपूसही केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना महाजन यांनी अजब तर्कट मांडले. ‘कालव्याच्या परिसरात पाय ठेवायला जागा नाही एवढे खेकडे आहेत. या खेकडे, उंदीर आणि घुशींनी हा कालवा पोखरला. गेल्या कित्येक दिवसांपासून हे काम सुरू आहे. त्यामुळे कालव्याला भगदाड पडले’, असे महाजन यांनी सांगितलं. त्यानंतर ही माहिती अभियंत्यांनीच दिल्याची पृष्टीही त्यांनी जोडली. महाजन यांच्या या अजब विधानावर आश्चर्य व्यक्त केले जात आहे.