ईव्हीएमची काळजी करू नका; अजित पवारांनी दिली टीप

0
1074

कोल्हापूर, दि. १७ (पीसीबी) – ईव्हीएम मशीनवर माझा विश्वास आहे. ईव्हीएमची काळजी करू नका, योग्य चिन्हांचे बटण दाबा, त्यानंतर भाजपच ईव्हीएम बदला, असे म्हणू लागेल, अशा सुचना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज ( सोमवारी) येथे कार्यकर्त्यांना दिल्या. कोल्हापुरातील इचलकरंजी येथे एका कार्यक्रमासाठी पवार आले होते. यावेळी ते बोलत होते.

अजित पवार म्हणाले की, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्ष यांच्यामध्ये  आगामी लोकसभेच्या ४० जागांवर एकमत झाले आहे.  राहिलेल्या ८ जागांच्या वाटपावर चर्चा  करण्यासाठी या आठवडाभरात बैठक होणार आहे. यावेळी त्यांनी भाजप सरकारच्या  कारभारावर टीकेची झोड उठवली. राज्यातील सरकार शेतकरी विरोधी आहे.  सरकारच्या कामगिरीवर एकही घटक समाधानी नाही. त्यामुळेच निवडणुकीच्या तोंडावर भाजपला राम आठवू लागला आहे.  तर हनुमानाची जात काढली जात आहे.

मुख्यमंत्री ,महसूल मंत्री, वस्त्रोद्योग मंत्री यंच्याकडून  नुसत्या फसव्या घोषणा सुरू आहेत. कोणतेही ठोस काम  त्यांच्याकडून होताना दिसत  नाही.  राज्यातील कापड उद्योग धंद्याची या सरकारने वाट लावली आहे. मोदी सरकार व फडणवीस सरकार हे फसवे आहे, असा घणाघात अजित पवार यांनी यावेळी केला .