इस्लाम म्हणजे शांतता; अल्लाहच्या ९९ नावातही हिंसाचार नाही- सुषमा स्वराज

0
647

अबुधाबी, दि. १ (पीसीबी) – इस्लामिक देशांच्या (ओआयसी) बैठकीत सहभागी झालेल्या भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी अपेक्षेप्रमाणे दहशतवादावर भाष्य केले आहे. भारतात हिंदू आणि मुस्लिम सौहार्दाने राहतात. पण खूप कमी लोक कट्टरवाद्यांच्या कचाट्यात सापडले आहेत. दहशतवाद केवळ धर्माला संपवण्याचे काम करतो. दहशतवादविरोधातील लढाई कोणत्याही विशिष्ठ धर्माच्या विरोधात नाही. इस्लामचा अर्थ शांतता आहे. अल्लाहच्या ९९ नावातही हिंसाचार नाही, असे स्पष्ट मत सुषमा स्वराज यांनी व्यवक्त केले.

अबुधाबी येथे ओआयसीची परिषद सुरू आहे. या परिषदेला सुषमा स्वराज या गेस्ट ऑफ ऑनर म्हणून उपस्थित आहेत. दरम्यान, सुषमा स्वराज यांच्या उपस्थितीमुळे पाकिस्तानने या परिषदेवर बहिष्कार टाकला आहे.

त्या पुढे म्हणाल्या, दहशतवादाविरोधात केवळ लष्करी किंवा कूटनीतीने लढले जाऊ शकत नाही. उलट धर्माचा खरा अर्थ समजून घेऊन त्याच्याशी लढा दिला जाऊ शकतो. यासाठी धर्म जाणणाऱ्या विद्वानांनी समोर आले पाहिजे. युवकांचे भविष्य वाचवावे लागेल. हिंसेचा मार्ग सोडला पाहिजे.

ऋग्वेदात म्हटले आहे की, देव एक आहे पण लोक वेगवेगळ्या पद्धतीने त्याचे वर्णन करतात. हेच जगातील सर्व धर्मांत म्हटले आहे. दहशतवाद आणि कट्टरवाद दोन्ही एकच आहेत. इस्लामचा संदेश शांतता आहे. कुराणमध्ये म्हटले आहे की, धर्माची सक्ती असू नये.