औरंगाबाद, दि. ९ (पीसीबी) – इंग्रजांच्या काळापासून मराठा समाजाला आरक्षण होते, मात्र, काँग्रेसने ते काढून घेत मराठ्यांना कुणबी ठरवले, असा आरोप विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केला. आम्ही मराठ्यांना आरक्षण देण्याचे वचन पाळले आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
मराठा समाजाला स्वतंत्र १६ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय नुकताच भाजप-सेना सरकारने घेतला आहे. त्यानंतर आता मराठा आरक्षणावरून श्रेयाची लढाई सुरू झाली आहे. औरंगाबादजवळ विकासकामांचे भूमिपूजन बागडे यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते.
बागडे म्हणाले की, मराठा समाजाला इंग्रजांच्या काळापासून असलेले आरक्षण १९६५ मध्ये काढून टाकण्यात आले. आणि मराठ्यांना कुणबी ठरवण्यात आले, असे त्यांनी सांगितले. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या घरासमोर घंटानाद केला होता. त्यावेळी आपण मराठा आरक्षण देण्याचा शब्द दिला होता. त्याप्रमाणे आपल्या स्वाक्षरीने मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याचे बागडे यांनी सांगितले.