आसाममध्ये नागरिकत्वाच्या यादीतून माजी राष्ट्रपतींचे कुटुंब गायब  

0
575

नवी दिल्ली, दि. १ (पीसीबी) – नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीजन (एनआरसी) ने जाहीर केलेल्या यादीत आसाममधील ४० लाख नागरिक अवैध ठरले आहेत. धक्कादायक म्हणजे माजी राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद यांच्या कुटुंबीयांची नावेच या यादीतून गायब झाल्याचे समोर आले आहे. तर उल्फा या अतिरेकी संघटनेच्या प्रमुखाचे नाव या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे  आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

माजी राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद यांच्या कुटुंबीयांची नावे या यादीत नाहीत. त्यांचे बंधू एकरामुद्दीन अहमद यांच्या कुटुंबीयांचंही या यादीत नाव नाही. आसामच्या दक्षिण अभयपुरी मतदारसंघातील भाजपचे आमदार अनंत कुमार यांचेही या यादीत नाव नाही, त्यामुळे त्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. या यादीत उल्फा या अतिरेकी संघटनेचा प्रमुख परेश बरुआ याचे नाव समाविष्ट केले आहे. मात्र, त्याची पत्नी बॉबी भुयान आणि दोन मुले अरिंदम आणि आकाश यांचे नाव या यादीतून गायब  झाले आहे.

दरम्यान, ४० लाख नागरिकांना  बेकायदा ठरवल्याने आसाममध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आसामलाच लागून असलेल्या बांगलादेशातील अनेक जिल्ह्यातही तणावाची स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने आसाममध्ये १४४ कलम लागू केले आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून राज्यात २२ हजार जवान तैनात केले आहेत.