आषाढी यात्रा सुरळीतपणे पार पडू द्यावी; खासदार उदयनराजेंचे आवाहन

0
350

मुंबई, दि. २२ (पीसीबी) – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून पंढरपुरासह अनेक शहरांमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने ठिय्या आंदोलन छेडले आहे. आषाढी एकादशी दिवशी सालाबादप्रमाणे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणारी शासकीय पूजा होऊ देणार नाही, या भूमिकेवर मोर्चेकरी ठाम आहेत. या पार्श्वभूमीवर  आषाढी यात्रा सुरळीतपणे पार पडू द्यावी, असे आवाहन साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आंदोलकांना केले आहे.

महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सर्वधर्म समभावाची परंपरा लाभण्याबरोबरच संतांची परंपरा लाभलेली आहे. या परंपरेतून महाराष्ट्राचे आराध्य दैवत, विठुमाऊलीला भेठण्यासाठी लाखो भाविक आणि वारकरी हरिनामाचा जप करत पंढरीत आषाढी आणि कार्तिकी वारी करतात, असे उदयनराजे यांनी म्हटले आहे.

आशिया खंडातीलच नव्हे, तर जगातील सर्वात मोठी परंपरा लाभलेला हा महामेळा मोठ्या भक्तीभावाने शेकडो वर्षांपासून सुरु आहे. हा भक्ती मेळावा मोठ्या उत्साहात आणि मंगलमय वातावरणात पार पाडण्याची जबाबदारी सर्वांची आहे, असे उदयनराजेंनी म्हटले आहे. शिवरायांच्या शिकवणीचा आदर्श आज संपूर्ण जग घेत असताना राज्य आणि केंद्र सरकारनेही शिवरायांच्या आदर्श विचारांनुसार सर्वांना समान न्याय देण्याच्या भावनेतून तातडीने पाऊले उचलण्याची गरज आहे,  असे उदयनराजे यांनी म्हटले आहे.