आषाढी यात्रेत विठ्ठलाच्या चरणी २ कोटी ९० लाखांचे दान

0
535

पंढरपूर, दि. ३० (पीसीबी) – आषाढी यात्रेत भाविकांनी देवाच्या चरणी अर्पण केलेल्या दानामुळे तिजोरीत  तब्बल २ कोटी ९० लाख ४४ हजार ६५१ रुपये इतकी रक्कम जमा झाली आहे. तर सोने-चांदीच्या दागिन्यांची मोजदाद अद्याप करण्यात आलेली नाही.

राज्यभर मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू असताना यंदा आषाढी वारीसाठी सुमारे १५ लाखांपेक्षा जास्त भाविकांनी पंढरपुरात हजेरी लावली. यात्रेच्या १५ दिवसांच्या काळात तब्बल ७ लाख भाविकांनी देवाच्या पायावर दर्शन घेतले, तर ११ लाख लक्ष भाविकांनी देवाचे मुखदर्शन घेतल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांनी दिली.

आषाढी पौर्णिमा झाल्यावर देवच्या हुंडीपेट्या, देणगी केंद्रे, लाडू विक्रीसह सर्व ठिकाणच्या रकमेची मोजदाद करण्यास  सुरुवात केली जाते. यंदा गेल्या वर्षीपेक्षा तब्बल २३ लाखांनी उत्पन्नात वाढ झाली आहे.  भाविकांनी १ कोटी ६०लाख रुपयांची देणगी दिली आहे. तर लाडू प्रसादातून ५० लाखाचे उत्पन्न मिळाले आहे.  देवाच्या पायावर ३६ लाखांची दक्षिणा वाहण्यात आली आहे.