नवी दिल्ली, दि. २२ (पीसीबी) – आम आदमी पक्षाचे नेते आशुतोष यांनी पक्षाला रामराम केल्यानंतर आता दुसरे मोठे नेते आशीष खेतान यांनीही पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे पक्षाला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.
आशीष खेतान यांनी २०१४ मध्ये लोकसभा लढवली होती. आशीष खेतान राजकारणात येण्याआधी पत्रकारिता करत होते. अनेक दिवसांपासून खेतान हे पक्षापासून दूर होते. आशीष खेतान आणि आशुतोष दोघांनीही १५ ऑगस्टलाच राजीनामा दिल्याचे बोलले जात आहे.
सक्रीय राजकारणातून मी बाहेर पडत असून आता संपूर्ण लक्ष हे वकिली व्यवसायात देणार असल्याचे स्वतः खेतान यांनी ट्विट करून म्हटले होते. दरम्यान, आम आदमी पक्षाकडून अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
दरम्यान, यापूर्वी आम आदमी पक्षाचे नेते आशुतोष यांनी बुधवारी पक्षाला रामराम केला आहे. आपमधील माझा प्रवास संस्मरणीय होता. आता हा प्रवास संपुष्टात आला आहे. वैयक्तिक कारणामुळे पक्षातून बाहेर पडत असल्याचे त्यांनी सांगितले. आशुतोष हे पत्रकारिता सोडून राजकारणात आले होते.