Maharashtra

आलेख घसरल्याने माझे नांव घेतल्याने त्यांना बळ येत असावे; ओवेसींचा राज ठाकरेंवर पलटवार

By PCB Author

December 05, 2018

मुंबई, दि. ५ (पीसीबी) –  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आलेख आता घसरत आहे. त्यामुळे ओवेसी ही एखादी टॅबलेट असावी किंवा माझे नाव घेऊन त्यांच्या अंगात बळ येत आहे, असे त्यांना वाटत असावे. मनसेचे कार्यकर्ते उत्तर भारतीयांवर हल्ले करतात, राज ठाकरे यांनी आधी स्वत:कडे पाहावे. राजकारणात स्वत:ला जिवंत ठेवण्यासाठी माझ्या नावाचा वापर करायचा असेल तर करावा, अशा शब्दांत एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी  राज ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले आहे.

ओवेसींच्या मदतीने भाजपचा देशात दंगली घडवण्याचा कट आहे, असा आरोप मनसे अध्यक्ष  राज ठाकरे यांनी विक्रोळीतील सभेत केला होता. या आरोपाला उत्तर देताना ओवेसी यांनी राज ठाकरे यांच्यावर पलटवार केला आहे. राजकारणात स्वत:ला जिवंत ठेवण्यासाठी माझ्या नावाचा वापर केला जातो, असे त्यांनी म्हटले आहे.

राज ठाकरे यांनी  विक्रोळीतील सभेत भाजपवर गंभीर आरोप केला होता. ओवेसींच्या मदतीने देशात राम मंदिराच्या मुद्द्यावरुन दंगली घडवण्याचा डाव असून याबाबत माहिती देणारा फोन आपल्याला दिल्लीवरुन आल्याचा दावा त्यांनी केला होता. राज ठाकरे यांच्या या आरोपांना असदुद्दीन ओवेसी यांनी प्रत्युत्तर दिले आहे.