आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजाच्या वतीने आज राज्यभर आंदोलन

620

मुंबई, दि. १३ (पीसीबी) – आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज आज (सोमवार) राज्यभरात आंदोलन करणार आहे. अमरावती-नागपूर महामार्ग आणि मनमाडमध्ये धनगर बांधव शेळ्यामेंढ्या घेऊन रस्त्यावर उतरणार आहेत. औरंगाबाद, जळगावमध्ये रास्ता रोको तर जालना-औरंगाबाद महामार्गावरील बदनापुरात गोंधळ आंदोलन करण्यात येणार आहे. धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरही धरणे आंदोलन करण्याचा इशारा धनगर समाजाच्या वतीने देण्यात आला आहे.

धनगर आणि धनगड अशा दोन वेगळ्या जाती असल्याचा सरकारचा दावा आहे. याबाबतचे प्रतिज्ञापत्र आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी उच्च न्यायालयात सादर केले आहे. मात्र, धनगर आणि धनगड ही फक्त प्रशासकीय चूक आहे. राज्यात एकही धनगड अस्तित्वात नाही. त्यामुळे १ सप्टेंबरच्या आत ही चूक दुरुस्त केली नाही. तर ५ लाख धनगर मिळून औरंगाबादेत एल्गार पुकारतील, असा इशारा धनगर समाजाने यापूर्वीच दिला होता.

आघाडी सरकारच्या काळात हा प्रश्न पेटला तेव्हा देवेंद्र फडणवीस स्वत: धनगरांच्या व्यासपीठावर गेले. त्यांनी सत्तेवर आल्यानंतर पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा प्रश्न सोडवू, असे आश्वासन दिले होते. मात्र, ४ वर्ष झाली तरी फडणवीसांनी धनगर आरक्षणाबाबत कोणतीही कार्यवाही केलेली नाही, असा  आरोप धनगर समाजाच्या वतीने करण्यात येत आहे.