आम्ही फोडाफोडी केली तर अख्खे भाजपा रिकामे होईल – नवाब मलिक

0
362

मुंबई, दि.३० (पीसीबी)- भाजपाचे काही आमदार स्वगृही म्हणजेच काँग्रेस-राष्ट्रवादीत परतण्यासाठी इच्छुक असून आम्ही फोडाफोडी केली तर अख्खे भाजपा रिकामे होईल असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ता नवाब मलिक यांनी केला आहे. विधानभवनात प्रसारमाध्यमांशी बोलता त्यांनी हा दावा केला. “भाजपा आपल्याकडे ११९ आमदार असल्याचा दावा करत आहे. पण आज तशी परिस्थिती नाही,” असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे.

“भाजपाने आव्हान स्वीकारले पाहिजे. आधी आपले ११९ आमदार दाखवा मग धमक्या द्या. भाजपामध्ये असे अनेक आमदार आहेत. ज्यांना अमिष दाखवून नेले. आता सत्ता नाही म्हणून ते चलबिचल झाले आहेत. आम्ही फोडाफोडीचे राजकारण करत नाही, पण जर केले तर अख्ख भाजपा रिकामे होईल हे त्यांना कळले पाहिजे,” असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे.

भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीचा शपथविधी हा बेकायदेशीर असल्याचा आरोप केला आहे. तसेच याविरोधात राज्यपलांकडे एकाने याचिका दाखल केली असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. यावर नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली असून भाजपा शपथेवर आक्षेप घेत आहे, परंतु तसे झाले तर संसद रिकामी करावी लागेल असा टोला लगावला आहे.

“अधिक नावे घेण्याची प्रथा भाजपानेच सुरू केली. हे बेकायदेशीर असले असे म्हटले तर लोकसभा बर्खास्त होईल. त्यांनी आधी स्वत:कडे पाहावे नंतर दुसऱ्यांकडे बोट दाखवावे,” असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे.