Pimpri

आम्हाला निगडीपर्यंत मेट्रो हवीच”, महास्वाक्षरी मोहीमेत नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

By PCB Author

January 16, 2022

नागरिकांच्या स्वाक्षरीचे निवदेन पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांना पाठविणार

पिंपरी दि. १६(पीसीबी) – स्वारगेट ते पिंपरी या मेट्रो मार्गिकेचे काम सुरू असतानाच पिंपरीपासून निगडीपर्यंत प्रस्तावित वाढीव मेट्रो प्रकल्पाला गती मिळावी. या मागणीसाठी भारतीय जनता पार्टी आणि निगडी, आकुर्डी प्राधिकरणातील नागरिकांच्या वतीने निगडीमध्ये शनिवारी (दिनांक 15 जानेवारी 2021) महास्वाक्षरी मोहीम घेण्यात आली. या मोहिमेत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून निगडीपर्यंत मेट्रोच्या मागणीला नागरिकांनी पाठबळ दिले आहे.

निगडीतील लोकमान्य टिळक पुतळ्याजवळ शनिवारी एक दिवसीय महास्वाक्षरी मोहीम पार पडली. मोहिमेचे उदघाटन पिंपरी चिंचवड शहराच्या माजी उपमहापौर शैलजा मोरे, विद्यमान नगसेविका शर्मिला बाबर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी उपस्थित भाजपा उपाध्यक्ष राजेंद्र बाबर, राजेश कडू, विजय तेंडुलकर, प्रसाद जोगळेकर, पोमाराम चौधरी, जगदीश चौधरी, ज्ञानदेव सोनजे, कृष्णा साळवे, अंजली पाटील, शुभांगी समुद्र, ज्योती कानेटकर, पूनम पोळ, नीलिमा कोल्हे, संतोष सायकर, शंकरराव किल्लेदार, विष्णुपंत जातेगावकर, नारायण पांडे, बाबासाहेब दांगट तसेच प्राधिकरण परिसरातील असंख्य नागरिक, विद्यार्थी, कामगर आणि विविध क्षेत्रातील मंडळी या मोहिमेत सहभागी झाले. त्यांनी आपली स्वाक्षरी नोंदवून निगडीपर्यंत मेट्रो जलद गतीने व्हावा, यासाठी हाक दिली आहे. नागरिकांच्या स्वाक्षऱ्या असलेले एक सविस्तर निवेदन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त आणि पुणे महामेट्रोला देण्यात येणार आहे.

वाढती लोकसंख्या आणि सार्वजनिक वाहतुकीच्या सक्षम पर्यायासाठी मेट्रो प्रकल्प सुरू आहेत. पिंपरी ते स्वारगेट मेट्रो मार्गाबरोबर हा मार्ग पिंपरीपासून पुढे निगडीपर्यंत करावा, ही शहरवासीयांची आहे. या प्रस्तावित वाढीव मेट्रो प्रकल्पाचा डीपीआर तयार आहे. या मार्गावर चिंचवड स्टेशन, आकुर्डी खंडोबा माळ चौक आणि निगडी भक्ती-शक्ती चौक असे तीन स्टेशन असणार आहेत. हा मेट्रो मार्ग निगडी प्राधिकरण, आकुर्डी, चिंचवड परिसरासह संपूर्ण पिंपरी चिंचवडकरांच्या दृष्टीने महत्त्वूपूर्ण आहे. प्रस्तावित प्रकल्पाला विलंब होत आहे. या निगडीर्यंत मेट्रोचे प्रत्यक्ष काम तातडीने सुरू व्हावे. या प्रकल्पाला गती मिळावी. यासाठी नागरिकांनी या मोहिमेत सहभाग घेतला. आपले म्हणणे प्रशासनापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केलेला आहे. नागरिकांच्या मताचा आदर करून सरकारी,. तसेच महापालिका आणि महामेट्रोच्या पातळीवरून निगडीपर्यंत मेट्रो प्रकल्पाला गती मिळावी, ही अपेक्षा सर्वाची असल्याचे नगरसेविका शर्मिला बाबर यांनी सांगितले.