Maharashtra

आम्हाला नाही, तर कुणालाच नाही अशा वृत्तीची भाजप फोडाफोडी करणार’- इम्तियाज जलील

By PCB Author

November 13, 2019

औरंगाबाद,दि.१३ (पीसीबी)- भाजपने सत्ता स्थापनेला नकार दिला त्यामागे भाजपची खेळी होती, शिवसेना त्यानंतर राष्ट्रवादीला सत्ता स्थापनेचे निमंत्रण देण्याचा केवळ सोपस्कार पार पाडण्यात आला. तीन पक्ष एकत्र येऊ शकत नाही हे भाजप ओळखून असल्यामुळेच राज्यपालांच्या माध्यमातून भाजपने आपली खेळी केली. आता भाजप फोडाफोडी करणार असल्याचा दावा एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार इम्तियाज जलील यांनी केला.

आम्हाला नाही, तर कुणालाच नाही’ अशा वृत्तीने सध्या भाजपची वाटचाल सुरू आहे. केवळ राज्यात नव्हे तर संपुर्ण देशात भाजपचा गुंडाराज सुरू असल्याची टिका एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे. राज्याला अस्थिरतेच्या खाईत लोटल्यानंतर आता पैशाच्या जोरावर फोडाफोडी करून भाजप कॉंग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेनेचे आमदार फोडून सरकार स्थापन करतील. असेही खासदार इम्तियाज म्हणाले.

राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर ती यशस्वी देखील ठरली आहे. आम्हाला नाही तर कुणालाच नाही? हे भाजपचे धोरण पहिल्यापासूनच राहिले आहे. ते फक्त महाराष्ट्रा पुरते मर्यादित नाही तर देशात याच गुंडाराज पध्दतीने भाजपने सरकारे स्थापन केली आहेत. दहा दिवस उलटून जाऊ द्या, पैशाच्या जोरावर भाजप शिवसेना, कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे आमदार फोडून पुन्हा सत्ता मिळवेल असा दावा देखील इम्तियाज जलील यांनी केला.