Maharashtra

आमदार डॉ. आशिष देशमुख यांची भाजपला सोडचिठ्ठी; राहुल गांधींची भेट घेणार

By PCB Author

October 02, 2018

नागपूर, दि. २ (पीसीबी) – भाजपमध्ये नाराज  असलेले काटोलचे आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी अखेर पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. तसेच यांनी आमदारकीचाही राजीनामा दिला आहे. आशिष देशमुख यांनी आज ई-मेल आणि फॅक्सने मुंबईला राजीनामा पाठवला आहे. बुधवारी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना प्रत्यक्षात राजीनामा सोपवणार आहेत.

आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर आशिष देशमुख आज (मंगळवार) वर्ध्यात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेणार आहेत. महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून आज वर्ध्यात काँग्रेसच्या केंद्रीय कार्यकारणीच्या बैठक  होत आहे. तसेच काँग्रेसच्या वतीने आज वर्ध्यात जाहीर सभेचेही आयोजन करण्यात आले आहे.

मी २ ऑक्टोबर २०१८ पासून विधानसभेतील माझ्या आमदारकीचा राजीनामा देत आहे, असे आशिष देशमुख यांनी हरिभाऊ बागडे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.