Maharashtra

आमचे सरकार आल्यास गोपीनाथ मुंडेंच्या मृत्युची चौकशी करणार – जयंत पाटील

By PCB Author

February 01, 2019

कर्जत, दि. १ (पीसीबी) – भाजप सरकारने सर्व व्यवस्था गुंडाळण्याचे काम सुरू  केले आहे. इव्हीएम मशिन हॅक होतात. ते एका नेत्याला माहीत होते आणि त्यांचा अपघात होतो, हे एका  हॅकरने स्वत: सांगितले आहे. त्यामुळे दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचा मृत्यू अपघातात झाला की ती हत्या होती, याची चौकशी आमचे सरकार आल्यानंतर करण्यात येईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी येथे सांगितले.

कर्जत येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेनिमित्त आयोजित जाहीर सभेत  जयंत पाटील बोलत होते. यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, युवा नेते रोहित पवार, माजी कुलगुरु सर्जेराव निमसे उपस्थित होते.

यावेळी पाटील म्हणाले की, जनतेला फसविणारी टोळी दिल्ली आणि मुंबईत सरकार म्हणून बसली आहे. तिजोरीत पैसा नाही आणि नुसता घोषणांचा पाऊस सुरू आहे, अशा शब्दात पाटील यांनी भाजप सरकारवर  तोफ डागली.