मुंबई, दि. २१ (पीसीबी) – आपल्या देशात व्यंगचित्रकारला किंमत नाही. ज्यावेळी प्रसिध्द व्यंगचित्रकार आरके लक्ष्मण गेले, तेव्हा मोजून शंभर लोकही त्यांचे अंत्यंदर्शन घेण्यासाठी आले नव्हते, अशी खंत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केली. त्यामुळे आरके लक्ष्मण यांची ही अवस्था असेल, तर इतरांचे काय बोलायचे, असे राज म्हणाले.
विकास सबनीस यांच्या ५० वर्षांच्या कारकीर्दीचा विशेष गौरव सोहळा शिवाजी पार्क येथील सावरकर सभागृहात झाला, त्यावेळी राज बोलत होते. व्यंगचित्र कारकिर्दीच्या पन्नाशीनिमित्त ‘रेषा विकासची भाषा ५० वर्षांची’ या विशेष कार्यक्रमात विकास सबनीस यांचा गौरव करण्यात आला.
पाच वर्षात विकास दिसला की नाही याची मला कल्पना नाही, मात्र, ५० वर्षात मला विकास सबनीस यांच्या रुपाने दिसला, अशी कोपरखळीही राज ठाकरे यांनी मारली. गेली ५० वर्ष व्यंगचित्र कला सोडून कोणतीही नोकरी केलेली नाही. ही कला ५० वर्ष जोपासणे हे आरके लक्ष्मण, बाळासाहेब ठाकरे आणि त्यानंतर विकास सबनीस यांचे नाव घ्यावे लागेल, असेही राज ठाकरे म्हणाले.