आदित्य ठाकरेच्या ट्विट्स ला अमृता फडणवीसच सणसणीत प्रत्युत्तर

0
346
मुंबई, दि.२७ (पीसीबी) – मुंबईतील आझाद मैदानातील आंदोलनात झालेल्या भाषणावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला होता. वारिस पठाण यांच्या वक्तव्याचा निषेध करताना, ‘शिवसेनेने बांगड्या घातल्या असतील, आम्ही नाही असं म्हटलं होतं,’ याच पार्श्वभूमीवर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील प्रत्युत्तर दिले होते.
त्यावर आदित्य ठाकरे यांनी ट्विट करुन माफी मागण्याची विनंती केली होती. “देवेंद्र फडणवीसजी, सहसा मी प्रत्युत्तर देत नाही. कृपया बांगड्यांबाबतच्या विधानाबाबत माफी मागा. सर्वात शक्तिशाली असा महिलावर्ग बांगड्या परिधान करतो. राजकारण चालूच राहील, पण ही मानसिकता बदलायला हवी. किमान माजी मुख्यमंत्र्यांकडून तरी अशी अपेक्षा नाही” असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले होते.

तसेच या वादात देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीदेखील उडी घेतली होती. रेशमी किड्याला आयुष्यातील ‘उपहास’ समजणार नाही, अशा शब्दात अमृता फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंना सुनावले. ‘रेशमी किड्याला आयुष्यातील ‘उपहास’ कधीच समजणार नाही, कारण पूर्वजांनी विणलेल्या सुखासीन ‘रेशमी’ आयुष्याचा उपभोग घेतच त्यांची भरभराट होते. देवेंद्र फडणवीसजी, तुमच्या संघर्षाचा आणि भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मेहनतीचा अभिमान वाटतो’, अशा आशयाचं वक्तव्य अमृता फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंच्या ट्वीटला कोट करत दिले होते.