आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याने भाजपला धडकी

0
411

नाशिक, दि, २२ (पीसीबी) – शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या नाशिक दौऱ्यामुळे शिवसैनिकांमध्ये चैतन्य निर्माण झाले असून, मित्रपक्ष भाजपला धडकी भरली आहे. जनआशीर्वाद यात्रेनिमित्त ठाकरे यांनी थेट संवाद साधून केलेल्या या दौऱ्यामुळे मतदारांमध्ये समाधान, तर नेत्यांमध्ये उत्साह संचारला आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीत सर्व राजकीय पक्ष स्वतंत्र निवडणूक लढले. त्यात भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या. त्याचा फटका शिवसेनेला बसला. त्यानंतर भाजपने शिवसेनेला बरोबर घेत सत्तेत स्थान दिले. पण, हे दुय्यम स्थान शिवसेनेला कधीच पचनी पडले नाही. त्यामुळे शिवसेनेने सत्तेत असूनही विरोधी पक्षाचीच भूमिका बजावली. लोकसभेत हे पक्ष एकत्र आले असले तरी अजून या दोन्ही पक्षांत विधानसभेसाठीचे जागावाटप न झाल्यामुळे कुरबुरी सुरू आहेत. त्यात हा दौरा कळीचा ठरला आहे.

 

नाशिकचा पश्चिम विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, असे सांगत शिवसेनेने त्यावर दावा केला. या जागेवर भाजपच्या आमदार सीमा हिरे या निवडून गेल्या आहेत. या मागणीवरुन भाजपला धडकी भरली आहे. नांदगाव विधानसभेसाठी भाजप सरसावली असताना हा मतदारसंघ शिवसेनेकडेच असेल असे सांगत त्यावरही आपला हक्क या दौऱ्यानिमित्त पुन्हा सांगण्यात आला आहे. हा दौरा मतदारांचे आभार व जनतेचे प्रश्न समजून घेऊन ते सोडविण्यासाठी असला तरी त्यात अनेक मतदारसंघांवर दावे करण्यात आल्यामुळे भाजपसह राष्ट्रवादी व काँग्रेसच्या गोटातही चिंता वाढली आहे.