मुंबई, दि.१८ (पीसीबी) – विरोधी पक्षांना जनतेने ठेंगा दिला आहे. आता विरोधी पक्षनेता असा करा, जो भाजपमध्ये प्रवेश करणार नाही, याची काळजी घ्या. कारण भाजप सरकारच्या काळात जे विरोधी पक्षनेते झाले, ते सरकारमध्ये आले आहेत, असा उपरोधिक सल्ला संसदीय कामकाज मंत्री विनोद तावडे यांनी विरोधी पक्षांना दिला आहे.
राज्य मंत्रिमंडळांचा रविवारी विस्तार झाला. या विस्तारात काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करून कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. यावरून तावडे यांनी विरोधी पक्षांना खोचक टोला लगावला आहे.
दरम्यान, याआधी २०१४ साली विरोधी पक्षनेते म्हणून शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांचे नाव समोर आले होते. मात्र, त्यानंतर शिवसेना सत्तेत सहभागी झाल्याने शिंदे मंत्री झाले. आता आमचा तिसरा पक्षनेता तरी पळवू नका, अशी खोचक टिप्पणी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केली.