मुंबई, दि. १२ (पीसीबी) – शाळा, महाविद्यालयांकडून कोणत्याही प्रकारची फसवणूक किंवा गैरव्यवहार झाल्यास विद्यार्थ्यांना ग्राहक मंचाकडे दाद मागता येईल, असे ग्राहक मंचाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे शाळा-महाविद्यालयांच्या मनमानी कारभाराला आळा बसणार आहे. तसेच अवाढव्य फी वाढवून विद्यार्थ्यांना वेठीस धरण्याचे प्रकार रोखता येणार आहेत. विद्यार्थी सुध्दा ग्राहक आहेत, असे सांगून अन्यायाविरुद्ध त्यांना ग्राहक मंचाकडे दाद मागता येणार आहे.
विद्यार्थी देखील एक ग्राहकच आहे. त्यामुळे शाळा, महाविद्यालयांनी कोणती फसवणूक,गैरव्यवहार केल्यास विद्यार्थ्यांना ग्राहक मंचाकडे दाद मागण्याचा अधिकार आहे, असे ग्राहक मंचाने म्हटले आहे. दरम्यान गोरेगावच्या ओबेरॉय इंटरनॅशनल शाळेत शिकणाऱ्या आदित्याला शाळेन परीक्षेस बसण्यास परवानगी नाकारली. याविरोधात तिने ग्राहक मंचाकडे धाव घेतली. त्यानंतर ग्राहक मंचाने विद्यार्थी ग्राहक नाहीत, असा निर्वाळा देत त्यांची याचिका फेटाळून लावली.
याविरोधात विद्यार्थी ग्राहक कसा नाही, अशी पुन्हा एक याचिका तिने दाखल केली. विद्यार्थीही ग्राहकच असतो, याबाबतचे तिने पुरावे सादर केले . अखेर ग्राहक मंचाने तिच्या याचिकेची दखल घेत शाळेविरुद्ध तक्रार दाखल करून घेतली. शाळेने महाराष्ट्र शिक्षण समितीच्या किंवा युजीसींच्या कोणत्या नियमांचे उल्लंघन केले आहे का ? याचा अभ्यास करून शाळेवर योग्य ती कारवाई करणार असल्याचे ग्राहक मंचाने सांगितले आहे.