Maharashtra

आता जनताच सत्ता परिवर्तन घडवून आणेन – अमोल कोल्हे

By PCB Author

October 12, 2019

नाशिक, दि. १२ (पीसीबी) – जनतेचा  माझ्या सभांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.  त्यामुळे महाआघाडीचे उमेदवार नक्की निवडून येतील.  भाजपने शेतकऱ्यांची दिशाभूल केली आहे. या सरकारच्या पारदर्शीपणाचा बुरखा टराटरा फाटला आहे. आता जनताच सत्ता परिवर्तन घडवून आणेन,  असा विश्वास राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला आहे.

अमोल कोल्हे नाशिकमध्ये महाआघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित जाहीर सभेत बोलत होते. शिवसेना विधानसभा निवडणुकीत २८८ पैकी केवळ १२४ जागा लढवून मुख्यमंत्रिपदाची स्वप्ने बघत आहे. हे अवास्तव आहे, अशी टीका त्यांनी शिवसेनेवर केली.

सरकारने शेतकऱ्यांचा, रोजगाराच्या बाबतीत तरुणांचा  अपेक्षाभंग केला आहे. सरकारच्या पारदर्शीपणाचा बुरखा आता फाटला आहे. भाजप फक्त आश्वासन देत आहे. ती पूर्ण करताना दिसत नाही.  जो माणूस सरकारविरोधात बोलत आहे, त्याच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावला जात आहे,  असा आरोपही कोल्हे यांनी यावेळी केला.