Maharashtra

आता उध्दव ठाकरेंनी पराभवाची सवय करून घ्यावी – इम्तियाज जलील

By PCB Author

June 11, 2019

औरंगाबाद, दि. ११ (पीसीबी) –  ही तर सुरूवात आहे, आता उध्दव ठाकरे यांनी  पराभवाची सवय करून घ्यावी. आगामी विधानसभा निवडणुकीच्या मैदानात आपण पुन्हा आमने-सामने येऊ, असा सुचक इशारा  एमआयएम-वंचित बहुजन आघाडीचे नवनिर्वाचित  खासदार इम्तियाज जलील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना दिला आहे.

इम्तियाज जलील यांचा हैदराबाद येथे पक्षाच्या वतीने   सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी  उध्दव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. औरंगाबादमध्ये शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांचा झालेला पराभव केवळ त्यांचा नाही तर तो माझाही पराभव आहे, असे उध्दव ठाकरे यांनी म्हटले होते. यावर जलील यांनी प्रत्युत्तर दिले.

जलील पुढे म्हणाले की, आगामी विधानसभा निवडणुकीत एमआयएमचे मराठवाड्यात सात आमदार निवडून येतील,  असा विश्वासही  त्यांनी यावेळी व्यक्त केला.   एमआयएमच्या औरंगाबादेतील विजयाने महाराष्ट्रात चिंतन बैठका सुरू झाल्या आहेत.  उध्दव ठाकरेंनी  आता असे पराभव पचवण्याची सवय लावून घ्यायला हवी.  मराठवाड्यात एमआयएमचे सात आमदार निवडून आणल्याशिवाय राहणार नाही, असा दावा त्यांनी केला.