Pimpri

‘…आणि कात्रज बोगद्याजवळ भरधाव वेगातील दुचाकी घसरली’

By PCB Author

December 05, 2020

कात्रज, दि.५ (पीसीबी) : गुरुवारी पुण्यातील कात्रज बोगद्याजवळ सायंकाळी झालेल्या दुचाकीच्या भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. नवीन कात्रज बोगदा जवळील दरी पुलाजवळ हा अपघात घडला.

अरमान शब्बीर शेख (वय 20, रा. बोपोडी) आणि ऋषिकेश सुरेंद्र जाधव (वय 23, रा. पिंपळे गुरव), अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, अरमान आणि ऋषिकेश दोघेही मित्र आहेत. गुरुवारी सायंकाळी ते बाह्यवळण मार्गावरून पुण्याच्या दिशेने निघाले होते. नवीन कात्रज बोगदा ओलांडल्यानंतर दरी पुलापासून काही अंतरावर अरमान शेखची दुचाकी घसरली. यामुळे दुचाकीवरील दोघेही ही गंभीर जखमी झाले होते. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर भारती विद्यापीठ पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी गंभीर जखमी अवस्थेत पडलेल्या या दोघांनाही पोलिसांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारापूर्वीच दोघांचाही मृत्यू झाला होता.