Maharashtra

आज ती जळाली नाही, समाजाचा व व्यवस्थेचा बुरखा जळाला – चित्रा वाघ

By PCB Author

February 10, 2020

मुंबई,दि.१०(पीसीबी) – हिंगणघाटच्या निर्भयाचा आज वेदनादायी अंत झाला. कोणत्या शतकातं आहोतं आपण,दिवसेंदिवस महिलांचे प्रश्न कमी न होता वाढताहेत. बाई म्हणून तिच्या कतृत्वाच्या कहाण्यांपेक्षा अत्याचाराच्या कहाण्या होताहेत. कोण जबाबदार याला कोण घेणार जबाबदारी. आज ती जळाली नाही समाजाचा व व्यवस्थेचा बुरखा जळाला, असं भाजप नेत्या चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.

अनेकांनी हिंगणघाट जळीतकांडातील पीडितेचा मृत्यू झाल्यानंतर यावर संतप्त प्रतिक्रिया दिली असून आरोपीवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी होत आहे. चित्रा वाघ यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

हिंगणघाट जळीतकांडातील पीडितेची सात दिवस मृत्यूशी सुरु असलेली झुंज अखेर अपयशी ठरली आहे. पीडितेने आज सकाळी ७.५५ वाजता अखेरचा श्वास घेतला.

दरम्यान, महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनीही ट्विटर वरून यावर प्रतिक्रिया दिली आहे. माझ्यातली आई आज सुन्न, नि:शब्द झालीय… महाराष्ट्राच्या लेकीचा जीवनाशी संघर्ष संपला, आपण या ‘हिंसक-पुरुषी’ मानसिकतेशी संघर्ष सुरू करूया, असं त्या म्हणाल्या आहेत.