आगामी लोकसभेत भाजपला ३३० जागा; मुख्यमंत्र्यांचा विश्वास

0
511

मुंबई, दि. १३ (पीसीबी) – आगामी लोकसभेत भाजपला ३३० जागा मिळतील, आणि पुन्हा एनडीएचे सरकार केंद्रात सत्तेवर येईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. भाजप शक्तिकेंद्र प्रमुखांच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री बोलत होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, आगामी लोकसभा निवडणूक ही भाजपची नसून भारताची निवडणूक आहे. ही एक देशाच्या ५ हजार वर्षांच्या इतिहासातील ऐतिहासिक संधी आहे. यापूर्वी २००९ मध्ये केंद्रात काँग्रेसचे खिचडी सरकार आले होते. त्यामुळे निर्णय घेण्यास विलंब होत होता. त्यामुळे ते वेळकाढू सरकार ठरले होते.

गेल्या ५ वर्षांत पंतप्रधान मोदींनी अर्थव्यवस्थेचा चेहरामोहरा बदलून गती दिली आहे. त्यामुळे या देशाच्या इतिहासात २०२० ते २०२५ हा सुवर्णकाळ असल्याने ही संधी वाया घालवता कामा नये. माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम आझाद यांच्या ‘अग्निपंख’ या पुस्तकात  भारत २०२० ते २०३० या काळात जागतिक महासत्ता बनेल, असे म्हटले आहे, याचाही दाखला यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिला.