आगामी निवडणुकीत भाजपच्या ‘हर हर मोदी’ला काँग्रेस ‘बोल बम’ ने उत्तर देणार    

0
444

नवी दिल्ली, दि. २० (पीसीबी) – आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाच्या हर हर मोदीचा सामना काँग्रेस ‘बोल बम’ या घोषवाक्याने  करणार आहे. २०१४च्या निवडणुकीमध्ये भाजपच्या   अच्छे दिन आनेवाले है,  घर घर मोदी, अब की बार मोदी सरकार, हर हर मोदी या घोषणांनी जनतेला भुरळ घातली होती. आता  या धर्तीवर भगवान शंकराशीच जवळीक दाखवणारा ‘बोल बम’ ही घोषणा काँग्रेसने निवडणूक प्रचारात वापरण्याचा निर्णय घेतला आहे.

काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधींच्या प्रचारफेऱ्यांमध्ये तसेच अन्य कार्यक्रमांमध्ये कार्यकर्ते ‘बोल बम’च्या घोषणा देणार आहेत. विशेष म्हणजे मोदी व गांधी दोघेही स्वत:ला शिवभक्त म्हणवतात. उत्तराखंडमधील केदारनाथ या भगवान शंकराच्या मंदिराच्या सानिध्यात मोदींनी ध्यानधारणा केल्याचे सांगितले जाते, तर राहूल गांधींनी हिंदुंना पवित्र असलेली व भगवान शंकराचे स्थान मानली जाणारी कैलाश मानसरोवराची यात्रा नुकतीच केली आहे.

भगवान शंकराची स्तुती करताना हर हर महादेव म्हटलं जातं, त्याची भाजपानं हर हर मोदी अशी घोषणा केली. तर शिवभक्त ‘बोल बम’ ही घोषणाही देतात, जिचा आधार काँग्रेस घेणार आहे.  काँग्रेसवर मुस्लीमांचे लांगुलंचालन करण्याचा आरोप करण्यात येता. त्यासाठी हिंदुंना जवळ करण्यासाठी काँग्रेसने  हा निर्णय अत्यंत विचारपूर्वक घेतला आहे. ‘बोल बम’ ही घोषणा करून शिवभक्त हिंदुंना चुचकारण्याचा प्रयत्न  काँग्रेसचा असल्याचे दिसून येत आहे.