आकुर्डी, दि. ९ (पीसीबी) – आकुर्डी व रावेत नगराचे एकत्रित संचलन जोशपूर्ण वातावरणात आकुर्डी गावातील विठ्ठलवाडी व दत्तवाडी या परिसरामध्ये विजयादशमीच्या दिवशी सकाळी झाले. उपस्थित सर्व स्वयंसेवकांनी घोषाच्या तालावर ४५ मिनिटे गुणवत्तापूर्ण संचलन केले. मार्गावर जागोजागी नागरिकांनी संचालनाचे स्वागत केले व फुले उधळत राष्ट्रप्रेरित घोषणा दिल्या.
प्रा. रवांदळे म्हणाले की, तरुणांनी समाजातील दुष्ट प्रवृत्तीचा नाश करण्यासाठी एकत्र येण्याची गरज असून राष्टीय स्वयंसेवक संघ यासाठीचे एक चांगले व्यासपीठ आहे. पूर्वी सगळे जग अमेरिका, इंग्लंड यासारख्या प्रगत देशांकडे जगाचे नेतृत्व करणारे देश म्हणून पाहायचे, पण आज भारत ज्या प्रमाणे आणि ज्या गतीने प्रगती करत आहे, सगळे जग आता भारताकडे लक्ष लावून आहे. या प्रगतीमध्ये आपण सर्वांनी काही ना काही योगदान देत राहिले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
आकुर्डी गटाचे राजेश भुजबळ यांनी सर्वांना विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या.