आंबेडकरी जनतेचा विश्वास जिंकणारे फडणवीस पहिले मुख्यमंत्री– रामदास आठवले

0
441

मुंबई, दि. ३१ (पीसीबी) – आंबेडकरी जनतेचा विश्वास प्रत्यक्ष कृती करून जिंकणारा पहिला मुख्यमंत्री म्हणून मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांची नोंद करावी लागेल. आंबेडकरी जनतेबरोबरच शेतकरी, कामगार, कष्टकरी, शेतमजूर यांची काळजी वाहणारे मुख्यमंत्रीही  ते ठरले आहेत, अशा शब्दांत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले  यांनी मुख्यमंत्र्यांच्या  कामावर स्तुतीसुमने उधळली आहेत.

त्याचबरोबर  फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारला चार वर्ष पूर्ण होत आहेत. त्याबद्दल आठवले यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी ते म्हणाले की, या चार वर्षात तरूण, अभ्यासू, उत्साही, हसतमुख असणारा मुख्यमंत्री मिळाला. महाराष्ट्राच्या हितासाठी सतत नव्या निर्मितीची धडपड असणारा लोकाभिमुख मुख्यमंत्री म्हणून त्यांनी आपली छाप पाडली, असे आठवले म्हणाले.

महाराष्ट्रात अनेक गड, बालेकिल्ले जिंकता येतील. मात्र, कोणत्याही राजकीय योध्द्याला आंबेडकरी जनतेचा विश्वास जिंकता येणे शक्य नसते. फडणवीस यांनी हा बालेकिल्ला जिंकला आहे. फडणवीस आणि मोदी हे डॉ. आंबेडकरांच्या संविधानाला मानणारे, आरक्षणाचे, अॅटॉसिटी कायद्याचे आणि संविधानाचे रक्षण करणारे दूरदृष्टी असणारे नेते आहेत, असेही आठवले म्हणाले.