आंदोलन करण्याची मुद्दाम परिस्थिती निर्माण केली जातेय का ? – शरद पवार   

0
770

पुणे, दि. ५ (पीसीबी) –  आंदोलन करण्याची मुद्दाम परिस्थिती निर्माण केली जात आहे का ? असा मला प्रश्न पडतो, असे म्हणत राष्ट्रवादी  काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शंका व्यक्त केली आहे. आज गावा-गावात वातावरण बिघडले आहे. लोकांचा सरकारवर विश्वास राहिलेला नाही, असे मला वाटत नाही, असेही शरद पवार म्हणाले.

पवार पुण्यात पत्रकार संजय आवटे यांच्या ‘वुई द चेंज’ या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीवर भाष्य केले.

पवार म्हणाले की, कोणत्या समाजाचे लोक आत्महत्या करत आहेत, याबाबत अभ्यास करण्यासाठी गोखले अर्थशास्त्र संस्थेकडे काम दिले आहे.  त्यांच्या  अहवालात ५२ टक्के आत्महत्या करणारे शेतकरी मराठा समाजातील आहेत. विस्थापित मजुरांचे प्रमाणही मोठे आहे. ही अस्वस्थता मराठा मोर्चा आणि आरक्षणाच्या माध्यमातून बाहेर पडत आहे , असे शरद पवार म्हणाले. मात्र, घटनेमध्ये जी ज्यांना आरक्षण देण्याची तरतूद आहे,  त्यांच्या अधिकारांना, हक्कांना धक्का देखील लागता कामा नये, असेही पवारांनी स्पष्ट केले.

मोदी जेव्हा परदेशात जातात, तेव्हा भाजपमधील दिल्लीतील खासदार निर्धास्त असतात. मी त्यांना सांगतो, १९७७ ला पण अशीच परिस्थिती होती.  तसेच राजकीय नेतृत्वापेक्षा आपल्या अधिकारांबाबत सजग असलेला नागरिक अधिक महत्वाचा आहे. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक या देशातील लोक सहन करत नाहीत,  असेही पवार म्हणाले.