Maharashtra

अहमदनगर महापालिकेत त्रिशंकू परिस्थिती; शिवसेनेला सर्वाधिक २४ जागा

By PCB Author

December 10, 2018

अहमदनगर, दि. १० (पीसीबी) –  अहमदनगर महापालिकेत शिवसेनेला सर्वाधिक २४ जागा मिळाल्या  आहेत. तर  राष्ट्रवादी काँग्रेसने १४ जागा जिंकल्या आहेत. तर भाजपला अवघ्या १४ जागा मिळाल्या असून काँग्रेसला केवळ ५ जागांवर समाधान मानावे लागले आहे.  या निवडणुकीत कोणत्याच पक्षाला बहुमत न मिळाल्याने महापालिकेत त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे कोणत्या पक्षाचा महापौर बनणार याची उत्सुकता लागून राहिली आहे.   

नगर महापालिकेच्या ६८ जागांसाठी आज सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. भाजप आणि शिवसेनेत चुरस  होती. सुरुवातीला भाजप नगरमध्येही मुसंडी मारणार असल्याचे चित्र दिसत होते. मात्र,  दुपारी हे चित्र पालटले.  काँग्रेस-राष्ट्रवादीने जोरदार मुसंडी मारत २३ जागा जिंकल्या. त्यात राष्ट्रवादीला १८ तर काँग्रेसला ५ जागांवर विजय मिळाला आहे.

तर शिवसेनेला सर्वाधिक २४ जागा मिळाल्याने तो सर्वात मोठा पक्ष ठरला  आहे. तर बहुजन समाज पार्टी ४, अपक्ष २ आणि समाजवादी पार्टीने १ जागेवर विजय मिळवला आहे. दरम्यान, नगर पालिकेत बहुमतासाठी ३८ जागांची गरज असून कोणत्याही पक्षाला हा आकडा गाठता न आल्याने पुन्हा एकदा नगर पालिकेत त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे.