अहमदनगर, दि. ११ (पीसीबी) – अहमदनगरमधील पारनेरच्या निघोजमध्ये घडलेल्या कथित ऑनर किलिंग हे प्रकरण ऑनर किलिंगचे नाही, असा दावा पोलिसांनी केला आहे. या संबंधीचा अहवालही पोलिसांनी तयार केला आहे. यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे.
आंतरजातीय विवाह केल्याने वडिलांनी मुलगी रुक्मिणी आणि जावई मंगेश रणसिंग या दोघांना जाळल्याची घटना उघडकीस आली होती. यात मुलगी रुक्मिणीचा मृत्यू झाला तर जावई मंगेश हा जखमी झाला आहे.
पोलिसांनी या प्रकरणी १६९ प्रमाणे एक अहवाल पारनेर न्यायालयात सादर केला आहे. आता पोलिस रुक्मिणीचा नवरा मंगेश रणसिंग याचा जबाब घेणार आहेत. दरम्यान या प्रकरणी पकडलेल्या तीनही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
दरम्यान, अहमदनगरमधील पारनेर तालुक्यातील निघोजमध्ये आंतरजातीय विवाह केल्याने १ मे रोजी मुलगी आणि जावयाच्या अंगावर रॉकेल टाकून त्यांना पेटवले होते. या घटनेत मुलगी रुक्मिणी रणसिंगचा मृत्यू झाला होता. तर जावई मंगेश रणसिंग जखमी झाला होता. या दोघांचा सहा महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. परंतु मुलीच्या कुटुंबीयांना हे लग्न मान्य नव्हते.