Maharashtra

अहमदनगरसाठी ३०० कोटी देऊ; रावसाहेब दानवे अडचणीत  

By PCB Author

December 01, 2018

मुंबई, दि. १ (पीसीबी) – भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी अहमदनगर शहराच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांकडून ३०० कोटी रुपये देऊ, अशी घोषणा केली आहे. याप्रकरणी त्यांच्याविरोधात आचारसंहिता भंग केल्याची तक्रार शिवसेनेने निवडणूक अधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे केली आहे. यामुळे दानवे अडचणीत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

तर  द्विवेदी यांनी या तक्रारीची चौकशी करून राज्य निवडणूक आयोगाला अहवाल सादर केला असून कार्यवाहीसाठी निवडणूक अधिकाऱ्यांनी आयोगाचे मार्गदर्शन मागितले आहे.  दरम्यान, अहवाल तपासून योग्य निर्णय लवकरच घेऊ, असे राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी म्हटले आहे.

अहमदनगर महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे.   सावेडी उपनगरात झालेल्या भाजपच्या  प्रचारसभेत दानवे यांनी नगर शहराच्या विकासासाठी ३०० कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आचारसंहितेचा भंग झाल्याची तक्रार शिवसेनेच्या वतीने पक्षाचे माजी आमदार अनिल राठोड तसेच अपक्ष उमेदवार केतन रतिलाल गुंदेचा यांनी केली आहे.