Maharashtra

अहमदनगरमध्ये शिवसेना-राष्ट्रवादीच्या आघाडीचे प्रयत्न होते; रामदास कदमांचा गौप्यस्फोट

By PCB Author

January 01, 2019

मुंबई, दि. १ (पीसीबी) – अहमदनगर महापालिकेमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी यांची आघाडी करण्याचे  प्रयत्न सुरू  होते, असा गौप्यस्फोट राज्याचे पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते रामदास कदम  यांनी  आज (मंगळवार) केला आहे.  या आघाडीसाठी मी स्वतः  राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि काँग्रेस नेते व विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी चर्चा केली होती, असे कदम यांनी यावेळी सांगितले.  

अहमदनगर महापौर निवडणुकीत राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा दिला आहे. याबाबत  कदम म्हणाले की, विधानसभा निवडणूक निकाल लागण्याआधी राष्ट्रवादीने भाजपला पाठींबा देण्याची तयारी दर्शवली होती. त्यामुळे शिवसेना सत्तेतून बाहेर पडली, तर राष्ट्रवादी  ही जागा घेईल, अशी भीती आम्हाला वाटत आहे. नगरच्या महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने  पुन्हा एकदा राष्ट्रवादी भाजपाबरोबर आहे, यावर शिक्कामोर्तब झाले आहे, असेही कदम म्हणाले.

त्यामुळे पुन्हा एकदा भाजपने राष्ट्रवादीबरोबर युती केली आहे. मात्र राष्ट्रवादीचे खायचे दात वेगळे आहेत, असा आरोप कदम यांनी केला. अहमदनगर प्रकरणाबाबत मी अजित पवार आणि विखे पाटील यांच्याशी बोललो होतो. सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत होतो, असेही कदम म्हणाले.