अमरावती, दि. २१ (पीसीबी) – लोकसभेत तेलुगू देसम पक्षाने (टीडीपी) आणलेला अविश्वास ठराव मोदी सरकारने जिंकला. त्यामुळे हे सरकार स्थिर झाले आहे. दरम्यान, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र सोडले आहे. पंतप्रधान हे अहंकारी असून त्यांनी आंध्र प्रदेशच्या जनतेचा अपमान केला आहे, अशी टीका चंद्राबाबू यांनी केली आहे.
चंद्राबाबूंनी आंध्र प्रदेशची राजधानी अमरावतीमध्ये सचिवालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केंद्र सरकारने अन्याय केला असल्याचे म्हटले.
आंध्र प्रदेशला दिलेल्या आश्वासनांना न्याय देण्यात आला नाही. राज्याचे २०१४ मध्ये विभाजन झाल्यानंतर मोठ्या नुकसानीला राज्याला सामोरे जावे लागले आहे, असे चंद्राबाबू यांनी सांगितले.
आंध्र प्रदेशच्या ५ कोटी लोकांवर मोदी सरकारने अन्याय केला असून याचा केंद्र सरकारला पश्चात्ताप होईल. पंतप्रधान अहंकारी असून त्यांना सत्तेचा अहंकार आहे, असे म्हणत चंद्राबाबूंनी मोदींवर टीका केली.