Maharashtra

अशोक चव्हाण खोटारडे, आघाडीबाबत आंबेडकरांशी चर्चा नाही – इम्तियाज जलील

By PCB Author

December 05, 2018

औरंगाबाद, दि. ५ (पीसीबी) – भारीप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याशी आमची आघाडीबाबत बोलणी सुरू आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. यावर  ‘एमआयएम’चे आमदार इम्तियाज जलील यांनी  टीका केली आहे. ते म्हणाले मी स्वतः  याबाबात आंबेडकरांशी बोललो असून काँग्रेसकडून आघाडीबाबत कोणतीची बोलणी किंवा चर्चा माझ्याशी झालेली नाही, असे त्यांनी मला सांगितले आहे. काँग्रेस केवळ दिशाभूल करत असून अशोक चव्हाण खोटारडे आहेत, असे जलील यांनी म्हटले आहे. 

जनसंघर्ष यात्रेदरम्यान  अमरावतीत झालेल्या सभेत अशोक चव्हाण यांनी आघाडीबाबत आपली प्रकाश आंबेडकरांशी बोलणी सुरू असल्याचे विधान केले. तसेच ‘एमआयएम’ला कुठल्याही परिस्थितीत सोबत घेणार नाही, असेही म्हटले होते.

यावर जलील यांनी चव्हाण यांच्या विधानाचा खरपूस समाचार घेतला आहे.  दलित मतदार आपल्यापासून दूर जाऊ नयेत, यासाठी चव्हाणांचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. आंबेडकर यांच्याशी आमची बोलणी सुरू असल्याचा उल्लेख ते वारंवार करतात. एमआयएम’ला सोबत घेणार नाही, असेही  ते सांगतात. मात्र, हा त्यांचा खोटारडेपणा आणि जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे, अशी टीका जलील यांनी केली.