अशा महिलांना पुढील जन्म कुत्र्याचा मिळणार

0
481
अहमदाबाद, दि.१९ (पीसीबी) – ‘मासिक पाळी सुरू असताना पतीसाठी स्वत:च्या हाताने स्वयंपाक करणाऱ्या महिला पुढच्या जन्मात कुत्र्यांचा जन्म घेतील आणि त्यांच्या हातचे खाणारे पती पुढच्या जन्मी बैलाचा जन्म घेतील,’असे वादग्रस्त विधान स्वामी कृष्णस्वरूप दासजी यांनी केले आहे. कॉलेजच्या प्रिन्सिपल, हॉस्टेलच्या रेक्टर आणि प्यून यांना पोलिसांनी अटक केली आहे.
दासजी हे स्वामीनारायण मंदिराशी संबंधित आहेत. या मंदिराकडूनच भूज येथे एक कॉलेज चालविले जाते. या कॉलेजमध्ये दोनच दिवसांपूर्वी मासिक पाळी सुरू आहे का हे तपासण्यासाठी ६० मुलींना अंतर्वस्त्रे काढण्याचा प्रकार घडला होता. पाळी सुरू असताना मुलींना इतरांसाठी जेवण बनवायचे नाही असा या कॉलेजच्या वसतिगृहाचा नियम आहे. तो मोडला जात नाही ना हे तपासण्यासाठी हा प्रकार करण्यात आला. त्यावर दासजी यांनी हे विधान केले आहे. ‘जर पाळी सुरू असताना महिलांनी बनविलेले अन्न खाणारे पुरूष पुढच्या जन्मी नक्की बैलाचा होणार. माझे विचार आवडले नाहीत तरी मला काही फरक पडत नाही. हे सर्व शास्त्रात लिहिले आहे. त्यातील प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला सांगणार नाही. पण तुम्हाला इशारा देतोय. मासिक पाळीचा काळ ही एकप्रकारची तपस्याच आहे हे महिलांना समजत नाही. पुरुषांनी स्वयंपाक करणे शिकले पाहिजे. त्याची तुम्हाला मदत होईल,’ असे विधान दासजी यांनी केले. दासजी यांच्या या विधानाचा व्हिडिओ व्हायरल झाला असला तरी त्यांनी हे विधान कधी केले हे समजू शकलेले नाही.