अवघ्या ४ धावांमध्ये संघ माघारी; दहाही फलंदाज त्रिफळाचीत

0
416

तिरूअंनतपुरम, दि. १६ (पीसीबी) – आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शेवटच्या चेंडूमध्ये रंगणारे सामने आपण सर्वांनी अनुभवले आहेत. नुकत्याच पार पडलेल्या आयपीएलच्या बाराव्या हंगामात तब्बल २० सामने शेवटच्या षटकापर्यंत रंगले होते. मात्र केरळमधील एका स्थानिक सामन्यामध्ये संघ ४ धावांमध्ये माघारी परतला आहे.

केरळच्या मालापुरम जिल्ह्यात वायनाड आणि कासारगौड संघात सामना खेळवण्यात येत होता. पेरनथमाला मैदानावरील सामन्यात कासारगौड संघ अवघ्या ४ धावांवर माघारी परतला आहे. महत्त्वाची गोष्ट या संघातला अकरावा खेळाडूही एकही धाव काढू शकला नाही. कासारगौड संघातले दहाही फलंदाज त्रिफळाचीत होऊन माघारी परतले.

वायनाडच्या गोलंदाजांनी ४ धावा अतिरिक्त स्वरुपात दिल्यामुळे कासारगौड संघाने खाते उघडले. विजयासाठी आवश्यक असलेले ५ धावांचे आव्हान वायनाडच्या संघाने पहिल्याच षटकात पूर्ण केले. या सामन्याची स्थानिक क्रिकेट वर्तुळात सध्या चांगलीच चर्चा सुरु आहे.