अर्थसंकल्पीय अधिवेशन; आज शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर होणार

0
352
मुंबई, दि.२८ (पीसीबी) – महाविकास आघाडी सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. २० मार्चपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. या अधिवेशनात एकूण ६ अध्यादेश आणि १३ विधेयकं मांडण्याचं सरकारचं नियोजन आहे. महाराष्ट्र राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून (ता. २४) सुरवात झाली आहे. येत्या ६ मार्चला अर्थमंत्री अजित पवार राज्याचा अर्थसंकल्प सादर करतील.
या अधिवेशनात नगर परिषदांच्या प्रत्येक प्रभागातून केवळ एका सदस्याची निवड करणे, नगराध्यक्षांची निवड पूर्वीप्रमाणे नगरसेवकांमधून करणे, सरपंचांची निवडणूक पूर्वीप्रमाणेच ग्रामपंचायत सदस्यांमधून करणे आणि कृषी उत्पन्न बाजारसमित्यावरील शेतकऱ्यांची पूर्वीप्रमाणे अप्रत्यक्ष निवड करणे यासारख्या विधेयकांचा समावेश आहे. तसेच ‘महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा प्रत्यक्ष लाभ आजपासून सुरू होणार असून पहिल्या टप्प्यात प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावांमधील पात्र लाभार्थींची यादी लावण्यात येईल. दुसऱ्या टप्प्यातील गावांची यादी २८ फेब्रुवारीपासून लावण्यात येईल’, अशी घोषणा मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली.
त्याचप्रमाणे, अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची पहिली यादी जाहीर करणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे विरोधकांची अडचण होण्याची शक्यता आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत ठाकरे सरकारने ही घोषणा केली.
दरम्यान, पहिल्या यादीमध्ये प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावांचा समावेश असून, २० हजार शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात येणार आहे. तसेच ३५ लाख शेतकऱ्यांची कर्जमाफीची माहिती आली असून, आम्ही फक्त घोषणा नाही तर कामं केली आहेत, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी लगावला. कर्जमुक्तीची यादी आम्ही पुढे पुढे घेत जाऊन ही योजना आम्ही तीन महिन्यात पूर्ण करु, असे सांगत मागील काळातली कर्जमाफी आतापर्यंत चालू असल्याची टीकाही मुख्यमंत्र्यांनी केली.